लोणावळ्यात कोट्यवधीचा कचरा गैरव्यवहार; मनसेचा आरोप   

चौकशीची मागणी!

लोणावळा : लोणावळा शहरातील कचरा व्यवस्थापनावरून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. लोणावळा नगरपरिषदेने कचरा संकलन आणि विल्हेवाटीसाठी बीव्हीजी कंपनीला ९.५४ कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले आहे. या कंत्राट कराराअंतर्गत शहरातील कचरा गोळा करणे, विल्हेवाट लावणे, डेपो व्यवस्थापन, गार्डन देखभाल व सुरक्षारक्षक पुरविण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आली आहे. मात्र, या व्यवस्थेमध्ये गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आणि कचर्‍यातून मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न हेतुपुरस्सर दुर्लक्षित करून खासगी भंगारवाल्याला बेकायदेशीरपणे फायदा मिळवून दिल्याचा दावा लोणावळा शहर मनसेने केला आहे.
 
हॉटेल एव्हीयॉन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला लोणावळा मनसे अध्यक्ष निखिल भोसले, रमेश म्हाळसकर, शहर प्रवक्ते अमित भोसले, मधुर पाटणकर, अभिजीत फासगे, संगीता गुजर, दीपमाला बोभाटे, माधुरी साठे, निलेश लांडगे, संदीप बोभाटे, विश्रांत साठे, आकाश लोंढे, सिद्धार्थ कांबळे, साहिल सांडे, जुबेर मुल्ला व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
मनसेच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषदेने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी बीव्हीजी कंपनीसोबत करार केला. त्यानंतर २० मार्च २०२५ रोजी मुख्याधिकार्‍यांनी शाहरुख बाबू शेख नावाच्या ’बोगस’ भंगारवाल्यासोबत नोटरी करारनामा केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीचा पत्ता करारनाम्यात वेगळा आणि स्टॅम्प पेपरवर वेगळा नमूद आहे. तसेच, करारनाम्यानुसार ही व्यक्ती हयात नसल्याचे किंवा बोगस असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ९३ नुसार मुख्याधिकार्‍यांना असा करार करण्याचा अधिकार नसतानाही हा बेकायदेशीर करार केल्याचे मनसेने म्हटले आहे.
 
कचर्‍याचे वर्गीकरण केल्यावर प्लास्टिक, पुठ्ठे, काचेच्या बाटल्या आणि लोखंडासारख्या भंगारातून नगरपरिषदेला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि मागील २० वर्षे नगरपालिकेत काम करणारे सत्ताधारी नगरसेवक यांना होती. तरीही त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी हे उत्पन्न नगरपरिषदेकडे जमा न करता खासगी व्यक्तींना दिले आणि लोणावळेकरांवर कराचा बोजा वाढवला, असा गंभीर आरोप मनसेने केला आहे.
 
मनसेने या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यात मुख्याधिकार्‍यांचा बेकायदेशीर करार, भंगारवाल्याची सत्यता, कचरावेचकांना ओळखपत्र नसणे आणि बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकांकडून ऑन ड्युटी असताना गांजा पिणे यासारखा होणारा गैरप्रकार यांचा समावेश आहे. 
 
या सर्व प्रकारामुळे नगरपरिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि आतापर्यंतची भरपाई भंगारवाल्याकडून वसूल करण्याची मागणी मनसेने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. लोणावळ्यातील नागरिक या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा करत आहेत.

Related Articles